Maharashtra Weather Alert : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यावर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले असून, IMD ने कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात येत्या ४८ तासांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.(Maharashtra Weather Update)
वाऱ्याचा वेग, विजांचा कडकडाट आणि मुसळधार सरी यामुळे सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
राज्यात जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक भागांत दमदार पावसाचा अनुभव येत आहे.
IMD ने येत्या ४८ तासांसाठी राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे
या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकण विभाग : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
घाटमाथा : नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर (घाट परिसर)
या भागांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. विशेषतः सह्याद्रीच्या घाटमाथ्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी डोंगराळ भागात प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी.
यलो अलर्ट असलेले जिल्हे
या भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकण : मुंबई, ठाणे, पालघर
उत्तर महाराष्ट्र : धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड
विदर्भ : अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर
या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून, वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमीपर्यंत जाऊ शकतो. विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी व नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचू शकते. शेतात पाण्याचा योग्य निचरा होईल याची व्यवस्था करून ठेवा.
* येत्या ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा असल्याने या कालावधीत कोणतीही फवारणी टाळा. पावसामुळे फवारलेली औषधे वाहून जातील.
* राज्यात अनेक भागांत पावसाने जोर धरला आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन, निचरा, वाऱ्यापासून संरक्षण आणि वेळेवर उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असा सल्ला देण्यात आला आहे.